ताप
ताप असल्यास घाबरून जाऊ नका. बाळाच्या अंगावरील सर्व कपडे काढा. खिडक्या बंद ठेवू नका. घरात पुरेशी खेळती हवा असावी. पंखा सुरु करा. ताप उतरण्यासाठी ओल्या टॉवेलने / धोतराने पुसून काढा. बाळाला आंघोळ घालणे किंवा पाण्यात ५ मिनिटे बसवणे हा ताप उतरण्याचा आणखी एक मार्ग आहे. पाणी जास्त थंड वा गरम नको. पॅरासिटामोल सिरप ( उदा. क्रोसिन, कॅलपोल इ) योग्य डोसनुसार द्या. या उपायांनी ताप तात्पुरता उतरतो. म्हणून ताप येत राहिल्यास डॉक्टरी सल्ला घ्यावा.

जुलाब
जुलाबामुळे " डिहायड्रेशन" ( शरीरातील क्षार व पाणी कमी होणे ) होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. खालील द्रव्यपदार्थ देणे
१) New WHO ORS पाकिटे ( उदा. पुनर्जल, इलेकट्रोल इ )
२) घरगुती मीठ साखर पाणी - २०० मिली ( १ ग्लास) पाणी + १ चमचा साखर + चिमटी मीठ
३) भाताची पेज ( मीठ घातलेली)
४) साखर व मीठ घातलेले ताक
५) शहाळाचे पाणी
६) साधे पाणी ग्लुकोज पावडर, फळांचे रस, थंड पेय देणे टाळा, कारण त्यामुळे जुलाब जास्त होऊ शकतात. जुलाबामध्ये आलेला अशक्तपणा भरून निघण्यासाठी अन्नाची गरज असते. स्तनपान बंद करू नका. मऊ पचायला हलके अन्न द्या उदा. मुगडाळ व तांदळाची खिचडी, वरणभात, दहीभात, केळी, चिकू, पपई, आंबा यासारखी फळे.

बालदमा
बालदमा नियंत्रण मिळवण्यासाठी आपण आपल्या मुलास दोन प्रकारची मदत करू शकतात.
1) ज्या गोष्टीमुळे मुलास दमाचा त्रास जाणवतो ( ट्रिगर्स ) त्या निश्चित करा व त्या टाळण्यासाठी आपल्या मुलास सहाय्य करा. उदा. धूर, घुले, तीव्र वास, थंड हवा, केसाळ किंवा पिसे असलेले प्राणी उदा. कुत्रा, मांजर, पक्षी, शारीरिक श्रम व व्यायाम.
२) आपला मुलं योग्य ती औषध नियमितपणे व डॉक्टरांनी सांगितल्या प्रमाणे घेत आहे याची खात्री करा व नियमित तपासणीसाठी जा. जगभरात दम्यावर नियंत्रणासाठी सर्वमान्य पद्धती ही "इन्हेलर" प्रणालीच आहे. याचे कारण म्हणजे गोळ्या व सिरपपेक्षा इन्हेलर जास्त परिणामकारी व निर्धोक आहे.
आपल्या मुलास दम्याचा अटॅक आल्यास काय करावे?
मुलांस सरळ ताठ बसवा ( आडवे होऊ देऊ नका) मुलांस धीर देऊन शांत करा. घट्ट कपडे सैल करा. डॉक्टरांनी शिफारस केलेल्या मात्रेत त्वरित रिलिव्हर औषध द्या. पाच मिनिटे वाट पहा. परिस्थितीत सुधारणा न झाल्यास डॉक्टरांनी सल्ला दिल्याप्रमाणे रिलिव्हर औषधाची थोडी मात्रा आणखी द्या. मुलाला तरीही बरे न वाटल्यास लगेच डॉक्टरांना दाखवा.

शिशूची काळजी
* बाळाला हाताळण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावे.
* बाळाचे वजन ३ किलो होईपर्यंत आंघोळ टाळावी.
* आंघोळ घालण्यासाठी हळद, चण्याची डाळ, साय इ वापरू नये. कुठलाही सौम्य साबण व कोमट पाणी वापरावे.
* नाळ व बेंबी अंघोळीच्यावेळी साबणाने व पाण्याने धोवुन स्वच्छ व कोरडी करावी. त्यावर औषधी, पावडर, क्रीम / तेल लावी नका.
* टाल्कम पावडरचा वापर कमीत कमी करावा. मालिश करण्यासाठी खोबरेल तेल इष्ट मात्र. मालिश केल्याने त्वचेला त्रास होऊ शकतो हे ध्यानात घ्या.
* टाळूवर जोरजोरात तेल थापल्याने टाळू लवकर भरून येते हा समज चुकीचा आहे.
* डोळ्यात काजळ वापरू नये, कानानाकात तेल घालू नये.
* बाळाची नखे छोट्या नेलकटरने काळजीपूर्वक कापावी.
* धुरी देण्यासाठी कोळसा / लाकूड जाळून धूर करू नये.
* बाळासाठी सुती कपडे वापरावेत.
* घुटी / ग्राईप वॉटर देऊ नका.
* बाटलीने दूध पाजू नका.
* आजारी मनुष्याचा संसर्ग टाळा.
शिशूमधील धोकादायक लक्षणे- हातपाय निळे पडणे, जोरात श्वास घेणे, कण्हणे, अंगारवरचे दूध न ओढणे, सुस्थ राहणे, झटके येणे, ताप येणे वा अंग थंडी पडणे, वारंवार उलट्या होणे, अंगावर पिवळेपणा दिसणे.
ऐकणे - घराची बेल, टेलिफोनची रिंग, फटाके, कुकरची शिटी या आवाजांना मुलं प्रतिसाद देते. ३ महिन्यानंतर बाळ आवाजाचा वेध घेऊ शकते.
दृष्टी - दीड महिन्यात बाळ माणसांच्या चेहऱ्याकडे बघू लागते. ३ महिन्याचे होईपर्यंत बाळाची नजर आसपास फिरणाऱ्या माणसांचा मागोवा घेते.

बाळाचा आहार
जन्म ते सहा महिने - केवळ आईचे दूध द्यावे.( पाणी, वरचे दूध, मध, बदाम देऊ नये )
६ महिने वयानंतर - स्तनपानासोबत खालील पूरक आहार द्यावा
१) फळे - चिकू, केळी, सफरचंद, पपई इ सोलून / कापून त्यातील गर चमच्याने मऊ करून बाळाला भरवा.
२) दही - साखर वा मीठ घालून बाळाला द्या.
३) भरड - तांदूळ ( ३ हिस्से ) + डाळ ( १ हिस्सा ) थोडेसे धुवून सुटी कापडावर पसरवून वाळवा. वाळलेले धान्य बारीक रव्याएवढे दळा. ही भरड हवाबंद डब्यात भरून ठेवल्यास सात ते दहा दिवस चांगली राहते. जरूर असेल तेव्हा आवश्यक तेवढी भरड तुपावर भाजून पाणी घालून शिजवा. त्यात मीठ, साखर, दूध घालून खिमट / खीर स्वरूपात बाळाला द्या.
४) खीर - रवा, गव्हाचे पीठ किंवा नाचणीचे सत्त्व यात दूध घालून त्याची खीर बाळाला द्या.
५) शिरा, उपमा
६) बटाट्याचे काप ( फिंगर चिप्स ), फळांचे तुकडे, इडलीचा तुकडा, गाजर, काकडी, केळी, टोमॅटोचे तुकडे, असे पदार्थ बाळ स्वतः हाताने चिमटीत धरून खाऊ शकते.
७) आपल्याच खाण्यातील पदार्थ मऊ करून ते बाळाला द्या. बाळासाठी मसाला किंवा तिखट घालण्याआधी थोडे अन्न बाजूला काढा. दूध भात, दूध पोळी, खिचडी, भाजी पोळी, वरणभात द्या
८) ज्या घरांमध्ये सामिष ( नॉन व्हेज ) आहार घेतला जातो, त्या घरातील मुलांना ६ महिन्यानंतर अंडे, मासे, चिकन, मटण देण्यास हरकत नाही. बाळ १ वर्षाचे होईपर्यंत त्याने इतर कुटुंबियांसोबत नाश्ता, दुपारचे जेवण व रात्रीचे पूर्ण जेवण घ्यायला हवे.
खालील पदार्थ देण्याचे टाळा
१) सूप, भाताची पेज, कांजी, डाळीचे पाणी, फळांचे रस - पातळ पदार्थात ताकत ( कॅलरी ) कमी व पाणी जास्त असते.
२) बिस्किटे, नूडल्स, वेफर्स, चॉकलेट, थंड पेय, केक, पेस्ट्री
३) वरचे दूध हा काही पूरक आहाराचा भाग नव्हे, त्यापेक्षा दुधाचा पदार्थाचा ( दही, तूप, लोणी, पनीर ) आहारात समावेश असावा. दूध-भात किंवा दूध-पोळी देऊ शकता.
४) बालान्नाचे तयार डब्बे टाळा.

लसींबद्दलची विशेष माहिती
लसीकरणाने बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते परंतु तो आजार होणारच नाही असे नसते.
* बी. सी. जी. - लस दिलेल्या जागी दोन दिवस चोळणे, शेकणे टाळावे. लस दिल्यानंतर ४ ते ५ आठवड्यात त्या जागी पुरळ येते, रक्तातून पु किंवा पाणी येते. नंतर आपोआप बरे होऊन त्या जागी खूण उमटते.
* पोलिओ – लस देण्याआधी व नंतर बाळाला उपाशी ठेवू नये. पोलिओ लसव्यतिरिक्त दरवर्षी पाच वर्षाच्या आतील बालकांना पल्स पोलिओचे दोषे आवश्यक पाजा.
* ट्रिपल - लस टोचल्यानंतर १ ते २ दिवसात गाठ येणे, चीड चीड असे त्रास होऊ शकतात. तापासाठी पॅरासिटामोल औषध द्यावे व गाठीजागी बर्फाने शेकावे.
* गोवर, एम. एम. आर. - लस दिल्यानंतर ५ ते ६ दिवसात ताप येऊ शकतो व क्वचित पुरळ उठते. तापाचे औषध जरुरीनुसार देणे.
* कावीळ ब - या जीवघेण्या आजारापासून संरक्षण मिळते. ज्यांना लहानपणी ही लस टोचली गेली नसेल, त्यांनी ही लस मोठेपणीसुद्धा आवश्यक टोचून घ्यावी.
* कावीळ अ, टायफॉईड - कावीळ, टायफॉईड या आजारांपासून संरक्षणासाठी ही लस घेतात. लहानपणी न घेतल्यास १० वी, १२ वी वा महत्वाच्या परीक्षेस बसलेल्या मुला-मुलींना वर्षाच्या सुरवातीस लस द्यावी व आजार टाळावा.
* रुबेला - ही लस मुलींना ११ वर्ष वयाच्या पुढे दिल्यास तिला होणाऱ्या बाळांना जन्मजात हृदयरोग, बहिरेपणा व आंधळेपणा यापासून संरक्षण मिळते.
* मेंदूज्वर - मेंदूतापापासून संरक्षण होऊन मतिमंदता टाळता येते.
* फ्लू - बालदमा किंवा हृदयाचे विकार असलेल्या मुलांना ही द्यावी.
* डायरिया - रोटाव्हायरस या जंतूमुळे शिशुंना गंभीर डायरिया होतो. जुलाब दिवसातून २०-२५ वेळा होतात, तसेच ८-१० दिवस चालतात. आपल्या शिशुला घातक रोटाव्हायरस डायरियापासून वाचवण्यासाठी ही लस द्यावी.
* कांजण्या - ही लस वयाच्या १ वर्षानंतर द्यावी.
* आय. पी. व्ही. - पोलिओपासून बालकाच्या संरक्षणासाठी ही लस पोलिओ थेंबापेक्षा श्रेष्ठ आहे.
